स्वास्थ्यपूर्ण जगासाठी आयुर्वेद शाश्वत पर्याय
पुणे: “आयुर्वेदासह इतर भारतीय चिकित्सा पद्धतींचे महत्व अनेकदा अधोरेखित झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील आयुर्वेदाला, भारतीय पारंपरिक चिकित्सेला प्रोत्साहन दिले असून, औषध निर्माणाचा पहिला प्रकल्प जामनगरला उभारला आहे. स्वास्थ्यपूर्ण जगासाठी आयुर्वेद हा शाश्वत पर्याय असून, त्याला लोकाभिमुख करण्यासाठी आपण सर्वानी एकत्रित प्रयत्न करायला हवेत,” असे मत आयुष मंत्रालयातील राष्ट्रीय संशोधक प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले. आयुर्वेदावर शंका उपस्थित करून त्याला डावलण्याचे षडयंत्र काही लोक करत असून, त्याला मोडीत काढण्यासाठी आपल्याला जागरूक राहायला हवे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापूर आणि श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री विश्व व्याख्यानमाला व सातव्या राष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचे उद्घाटन डॉ. भूषण पटवर्धन यांनी केले. कोंढवा रस्त्यावरील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात झालेल्या सोहळ्यास ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, आमदार माधुरी मिसाळ, इस्कॉनचे सुंदरवर दास, भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाच्या बोर्ड ऑफ एथिक्स अँड रजिस्ट्रेशनचे अध्यक्ष वैद्य राकेश शर्मा, ट्रस्टचे अध्यक्ष श्री सद्गुरू आनंदनाथ महाराज सांगवडेकर, मुख्य चिकित्सक व विश्वस्त वैद्य समीर जमदग्नी, श्री विश्ववतीचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर, श्री धूतपापेश्वरचे रणजित पुराणिक, बैद्यनाथचे सिद्धेश शर्मा आदी उपस्थित होते. यावेळी वागभट दीपिका व आयुर्वेदीय औषधी द्रव्य शोधनविधी या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, “अनेक वैद्याकडून बरेच काही शिकलेलो आहे. भारतीय संस्कृती, परंपरा यामध्ये भेदभाव नाही. नवनवीन संशोधन, नवोन्मेष करून आयुर्वेद अधिकाधिक विकसित व समृद्ध करण्यासाठी योगदान दिले पाहिजे. आयुष मंत्रालयाच्या मार्फत या भारतीय चिकित्सा पद्धती प्रभावशाली व लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.”
माधुरी मिसाळ म्हणाल्या, “भारतीय चिकित्सा आणि ज्ञानवंत सर्वश्रेष्ठ आहे. आयुषमुळे आयुर्वेदाला प्रोत्साहन मिळाले आहे. सरकारने पुढाकार घेतल्याने आयुर्वेदाला चांगले दिवस आले आहेत. फ्रान्स, रशिया यांसारख्या देशांत आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार मोठ्या होतो; तर आयुर्वेदाचे मूळ असलेल्या भारतात त्याला प्राधान्याने स्वीकारायला हवे. आयुर्वेदाच्या संवर्धनासाठी भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.”
उल्हास पवार म्हणाले, “भारतीय संस्कृती, परंपरेत आयुर्वेदाला फार महत्व आहे. अलीकडच्या काळात पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाने या भारतीय चिकित्सा व परंपरा काहीशा मागे पडल्या. परंतु, आयुर्वेद, योग याविषयी समाजात जागृती होत आहे. आयुर्वेदाला लोकप्रिय व परिणामकारक करण्याचे दायित्व तुम्हा आयुर्वेदिक डॉक्टरांवर आहे. चांगले संशोधन करून आयुर्वेद गुणकारी करण्यावर भर द्यावा.”
श्री सद्गुरू आनंदनाथ महाराज सांगवडेकर म्हणाले, “आयुर्वेदाचा समाजाला लाभ व्हावा, समाजाचे स्वास्थ्य चांगले राहावे, यासाठी रुकडीकर ट्रस्ट सातत्याने उपक्रम राबवत आहे. नव्या द्रव्यांचा, रसांचा शोध व निर्मिती करण्याचे, नव्याने आयुर्वेद शिकणाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम यापुढेही अव्याहत सुरु राहील.”
यावेळी मान्यवरांच्या हस्ते आयुर्वेदामध्ये अनेक पिढ्यांपासून योगदान देणाऱ्या आयुर्वेदाचार्यांचा सन्मान करण्यात आला. सुंदरवर दास, रणजित पुराणिक यांनी मनोगत व्यक्त केले. वैद्य परेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. निरंजनदास सांगवडेकर यांनी आभार मानले.